रोज सकाळी तुझी आठवण येते आई
निघून जाण्याची अंमळ तू केली घाई
सहवास तुझा अजून वाटे हवाहवासा
तुझ्या विना गे एकाकी मी पडले बाई
सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी तुला सांगणे
निरागस जणू होते माझे असे वागणे
मला आवडे ऐकण्यातली एकतानता
आणि तल्लीन सांगण्यातले माझे होणे
उत्तर नव्हते तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांचे
तरी कधी ना टाळलेस तू ऐकायाचे
सांगून तुला सारे काही मी निश्चीन्त
हलके हलके संवादातुन वाटायाचे
आज पुन्हा उद्विग्न असे मन पण तू नाही
मी एकाकी सोबत माझ्या कोणी नाही
सांगशील तू काय? आठवत बसले आहे
अनेक मिळती पर्याय मला पण सुचे न काही
किती सावरू तरी नावरे मनातले कढ
ठरे भावना इथे बये बुद्धीच्या वरचढ
क्षणाक्षणाला प्रसंग मोठे उभे ठाकती
तुला स्मरूनी चालत आहे वाटा अवघड
©उमा जोशी
#navratri #आई #अनलज्वाला