काळ झाला खूप त्याला खूप वर्षेही उलटली
भूतकाळातील त्या मग ही पिढी घटना विसरली
शोध घेताना कळाले राहिले मागेच काही
ना कुणीही शोधले ते त्यात माझा दोष नाही
घात झाला रेष जेव्हा पार केली जानकीने
सत्त्व रक्षण खुद्द केले घेत काडी मैथिलीने
रावणाचा वध करूनी राम झाला विश्वविजयी
त्यागिले सीतेस हा पण काय त्याचा दोष नाही?
हारला भावांस साऱ्या डाव लावी धर्मराजा
द्रौपदीही हारला दुर्योधनाला माज आला
याज्ञसेनी बोल लावी पांडवांची हार झाली
चूक दाखविली तिने तर त्यात काही दोष नाही!
पाहिले ना दैन्य कोठे राजवाडा हीच व्याप्ती
भोगले ना दुःख काही रोगराई दूर होती
एक दिवशी सामना पण दुःखदैन्याचाच झाला
मुक्त होण्या बुद्ध झाला तो तयाचा दोष नाही!
--- २९/०३/२०२४
©उमा जोशी
#Hope #दोष